आशावादी मार्गदर्शक!

सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु आहेत. सर्वांचीच सुट्टीला कुठे ना कुठे जाण्याची लगबग सुरु असलेली दिसून येते. फेसबुकच्या भिंतीवर काहींचे छायाचित्रही झळकतांना दिसतात. त्यात कोंकण वगैरे जाण आपल्या सर्वानाच फार भारी वाटतं. अशाच कोकणाला लागून पालघर जिल्ह्याजवळ वाडा हा एक दुर्गम भाग. वाड्यापासून २५किमी वर वसलेलं दुगाड हे एक छोटस गाव. ठाण्यापासुन २०-२२ किलोमीटर भिवंडी तालुक्यात दुगाड हे गाव मोडतं. इथल्या ग्रामस्थांच्या बोलीभाषेत कोकणाची छाप चांगलीच दिसून येते. खरं तर मुंबई-ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असूनही हा संपूर्ण भाग विकासाच्या मुख्य प्रवाहापासून आजही कोसो दूर आहे.ह्याच दुगाड गावात आणि परिसरात सध्या एका नवीन शैक्षणिक उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवतोय एक उमदा तरुण कुणाल यशवंत पाटील.

कुणाल यशवंत पाटील... दुगाड गावातील एका सर्वसामान्य मध्यम वर्गीय कुटुंबातला मुलगा. त्याच प्राथमिक शिक्षण गावातच झालं. पूढे इंजिनीरिंगसाठी कुणाल धुळे शहरात ४ वर्षे राहिला. त्याच दरम्यान धुळ्यासारख्या ग्रामीण भागात काही अधिकारी व समाजकारणी लोकांच्या पुढाकाराने स्पर्धा परीक्षा चळवळ आकाराला येत होती. मुंबईपासून शेकडो किलोमीटर दूर असणाऱ्या धुळ्यातून कितीतरी मुलं अधिकारी होतात आणि पुढे जाऊन आपल्या घराचं, गावाचं, जिल्ह्याचं नाव मोठं करतात, हे सर्व कुणाल अनुभवत होता. त्याच्या चाणाक्ष बुद्धीला हे कळायला वेळ लागला नाही कि ह्या सगळ्या प्रवासात ते विद्यार्थी आपल्या आजूबाजूच्या मुलांनाही प्रोत्साहित करत असतात. त्यामुळे तिथल्या तरुण मुला-मुलींच्या आयुष्यात आणि गावातसुद्धा विकासाच्या नव्या संधी निर्माण होत आहेत.त्यावेळी कुणालच्या मनात स्वाभाविक प्रश्न पडत होते कि हे सगळं आपल्या गावात/तालुक्यात का होऊ नये? नुसते विचार करून त्यात वेळ दवडण्यापेक्षा काहीतरी करून दाखवले पाहिजे ह्या विचाराने कुणालला पछाडले आणि इंजीनीरिंग करत असतानाच MPSCची परीक्षा उत्तीर्ण करून कुणाल अधिकारी बनला. काही वर्षे कामाचा अनुभव घेऊन कुणालने पुढे GATE ची परीक्षाही पास केली आणि इंजिनीरिंग मधल्या पदव्युत्तर अभ्यासासाठी त्याने मुंबईच्या VJTI कॉलेजला प्रवेश घेतला.

माझी आणि कुणालची भेट इथलीच. तो माझा वर्गमित्र. मला कायम कुतूहल वाटायचं कि नेहमीच एक अधिकारी होण्याची इच्छा असलेला हा माणूस पुन्हा technical  शिक्षण घेण्यासाठी का आला असेल? कारण आमच्या कॉलेजात masters करायला आलेली बहुतेक मुलं उच्च पगाराच्या नोकरीच्या अगर किमान शिक्षकाच्या नोकरीच्या आशेने आलेली होती. पण आम्हा सर्वांमध्ये कुणाल वेगळा होता. तो इथे फक्त एक अनुभव घ्यायला आला होता. नवीन मित्र जोडायला आला होता. इथल्या वातावरणात आणि लोकांमध्ये राहुन कुणाल जे शिकला ते कोणत्याही पगारात मोजता येण्यासारखं नाही. तो आम्हा सर्वांना नेहमीच म्हणतो कि आपण आपण नेहमी Best मिळवण्यासाठी धडपडायला हवं.

दरम्यान M.Tech ची डिग्री पूर्ण करत असतांनाच कुणाल बँकेचीही परीक्षा उत्तीर्ण झाला आणि सध्या एका राष्ट्रीयीकृत बँकेत अधिकारी म्हणून तो कार्यरत आहे. तयारीच्या ह्या काळात कुणाल त्याच्या आजूबाजूच्या अनेक aspirants साठी मार्गदर्शक होता. त्याचवेळी त्याच्या लक्षात आलं कि त्याच्या गावात अन परिसरात अनेक हुशार व होतकरू तरुण-तरुणी स्पर्धा परीक्षांसाठी धडपड तर करत आहेत पण योग्य मार्गदर्शनाअभावी ते योग्य ठिकाणी पोहोचू शकत नाहीयेत. ह्यासाठी आपल्याला काही करता येईल का हा प्रश्न आता कुणालला भेडसावत होता. त्या मुलांना गावाच्या पातळीवर मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी त्याने प्रयत्न सुरु केले. त्याचवेळी त्याच्या डोक्यात विचार चमकून गेला 'मीच माझ्या परिसरातल्या मुलांसाठी एक करिअर अकादमी सुरु केली तर?' विचार तर चांगला होता पण जॉब सांभाळून, पैशाची गणित बसवून, सर्व resources manage करून हे सगळं पुढं रेटायचं म्हणजे मोठं अवघड काम. मग त्याने हा विषय अधिक समजून घेण्यासाठी इतर भागात करिअर मार्गदर्शन अकादमी चालवणाऱ्या काही लोकांसोबत चर्चा केली. त्याचबरोबर आपल्या परिसराचाही सखोल अभ्यास केला. आपल्या मनातली हि योजना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी कुणाल आपल्या परिवार, मित्र-मैत्रिणी, नातलग ह्यांच्याशी चर्चा करून त्यांचीही मानसिकता तयार करत होता. सरतेशेवटी मार्च २०१७ ला सगळ्या गोष्टी जुळून आल्या. एप्रिल २०१७ मध्ये 'ध्येयासक्ती' करिअर अकादमीचा शुभारंभ झाला.

भिवंडी-वाडा रस्त्यावर अंबाडी नाका ह्या मोक्याच्या जागी एका इमारतीत कुणालने एक गाळा भाड्याने घेतला आणि रंगकाम-फर्निचरपासून.... electricity, विद्यार्थ्यांसाठी benches, कॉम्प्युटर्स व सोबत इंटरनेट connection वगैरे सर्व सोयींनी सुसज्ज अकादमी कुणालच्या श्रमातून आणि विचारांतून आकाराला आली. हि सर्व कामे अवघ्या चार दिवसांची सुट्टी घेऊन त्याने पूर्ण करून घेतली. एखाद्या गोष्टीचा मनापासून ध्यास घेतला कि माणूस कसा झपाटून कामाला लागतो हे मी त्या चार दिवसात कुणाल सोबत राहून अनुभवलं. ह्या कामात त्याला मित्रांची, परिवाराची आणि हितचिंतकांची फार मदत झाली. ह्या प्रयत्नांतून अंबाडी-वाडा-कुडूस भागातील विद्यार्थ्यांसाठी एक छोटसं का होईना पण हक्काचं ज्ञानमंदिर उभं करण्यात कुणालला यश आलं. ह्या अकादमीत कुणाल स्वतः शिकवणार आहेच पण त्याचबरोबर अनेक तज्ञ् शिक्षक सुद्धा येथे विद्यार्थ्यांच्या मदतीला असणार आहेत.

"माझ्या मागास भागाचा विकास करायचा असेल तर कार्यक्षम अधिका-यांची भक्कम फळी माझ्याच भागातून तयार करावी लागेल" ह्या कुणालच्या वाक्यात त्याची आभाळाएवढी स्वप्न तर दिसतातच पण जाणवतो दुर्दम्य आशावाद. हा आशावाद त्याच्या भागातील अनेक तरुण-तरुणींच्या स्वप्नांना येणाऱ्या काळात बळ देईल, याची मला खात्री वाटते.

स्वतःसाठी स्वप्न तर सर्वच बघतात आणि ती पूर्ण करण्यासाठी आपल्या सर्वांचीच धडपड असते. पण आपल्या स्वप्नातून दुसऱ्यांच्या जीवनाला आकार देण्यासाठी धडपडणाऱ्या ह्या अवलिया कुणालला सलाम!


------------------------------
कुणाल यशवंत पाटील
ह. मु. दुगाड, ता. भिवंडी, जि. ठाणे

प्रवास एका स्वप्नाचा...

चार वर्षांपूर्वी, Engineering च्या माझ्या शेवटच्या वर्षाला अपघातानेच (?) माझी भेट शितलशी झाली. अगदी किरकोळ शरीरयष्टी, साडेचार फूट उंची पण कायम हसरा अन निरागस चेहरा म्हणजे शितल पवार. पहिल्यांदा भेटलो तेव्हा वाटलंच नव्हत कि ह्या लहान मूर्तीची धडपड इतकी मोठी असेल. 

धुळे शहरातल्या एका सुखवस्तू कुटुंबात शितलचा जन्म झाला. तिची आई, संध्या सहकार खात्यात तर वडील सुधाकर BSNL मध्ये अधिकारी. पवार कुटुंबात पहिली लेक म्हणून शितल लाडात वाढलेली (जरा जास्तीच लाडात). वडिलांची वाचनाची आणि लिखाणाची आवड जणू तिला वारशातच मिळाली. लहानपणापासूनच अभ्यासात हुशार आणि त्याचबरोबर पालकांच्या (अति)दक्षतेमुळे १०-१२वीला तिने चांगले मार्क्स सुद्धा मिळवले आणि समाजाने घालून दिलेल्या प्रघाताप्रमाणे शितल पुण्यात MIT ला Computer Engineering ला join झाली. 

धुळ्यासारख्या छोट्या शहरातून अचानक पुण्यात येण, नवीन मित्र मैत्रीणी, शहरी वातावरण, इकडची modern lifestyle  ह्याच्या चांगल्या-वाईट परीणामातुन स्वतःला सावरून बाहेर पडण्याच्या धडपडीतच तिचा एक भयंकर अपघात होऊन उजवा हाथ खांद्यातून मोडला. चार महिन्यांसाठी अंथरुणात पडून तर रहावं लागलंच पण त्या हाताला कायमची कमजोरी आली. त्यात Engineering च वर्षही वाया गेलं. 'life थांबलं माझं आता, असं वाटायचं' शितल सांगते. पण तोच तिच्या life चा खरा turning point होता.

आपल्या रोजच्या धावपळीत आपण जराही उसंत न घेता कशा न कशाच्या मागे धावत असतो. कधी कधी गरज असते ती एका break ची. थोडंसं थांबून आत्मपरीक्षण करण्याची. जे चुकलंय, हुकलंय ते सावरण्याची. काही जण थांबतात पण काहींना थांबवतात ते असे अपघात. 

अपघातानंतर शितलला सक्तीची bed rest असल्यामुळे तिला काहीही काम करण्यापासून मज्जाव होता. अंथरुणात पडून पडून तिला साथ केली ती तिच्या पुस्तकांनी. तिने त्यादरम्यान खूप वाचन केलं. रिकामं मन भूताच घर, असं म्हणतात. मग स्वतःला गुंतवावं म्हणून तिने ब्लॉग लिहायला सुरुवात केली. त्याच दरम्यान शितलने - 'चुरगळलेली पानं' आणि 'ऋणात' हे दोन ब्लॉग्स लिहिले. ब्लॉगला मिळालेल्या प्रतिसादाने तिची वाचनाची आणि लिखाणाची गोडी अजून वाढली. परंतु त्याचवेळी तिला इतरही अनेक प्रश्न भेडसावत होते आणि त्यात सर्वात महत्वाचं म्हणजे Engineering नंतर पुढे काय? आत्ता पर्यंत तिला हे तर कळून चुकलंच होत कि Engineering आणि विशेषतः सॉफ्टवेअर क्षेत्रात काम करण्याची आवड तिला अजिबात नाही. अशातच नवीन trend नुसार आणि समाजप्रघाताप्रमाणे अधिकारी होण्याचा पर्याय तिला सुचवलं जात होता. पण ह्यावेळी निर्णय घाईत आणि फक्त प्रतिष्ठेसाठी न घेण्यावर ती ठाम होती.  त्याच दरम्यान तिची ओळख धुळे-जळगाव जिल्ह्यातील खेड्यापाड्यातील गरजू मुलांसाठी काम करणारया  दीपस्तंभ संस्थेच्या संस्थापक यजुर्वेंद्र महाजन यांच्याशी झाली. शितल सांगते सरांनी मला पहिल्याच भेटीत सांगितलं, 'तुझ्या आवडी आणि skills ऐकून मला वाटतं तू अधिकारी होण्यापेक्षा TISS ला पुढचं शिक्षण घे.' तोवर तर TISS काय आहे ? Social Work मध्ये Degree मिळते हे सुद्धा तिला माहिती नव्हतं. म्हणून सामाजिक क्षेत्र आणि त्याचा आवाका समजून घेण्यासाठी तिने वाचन सुरु केलं. त्याच बरोबर काही महिने तिने दीपस्तंभसाठी काम केलं. तिथे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या समस्या तिला जवळून पाहता आल्या. सरांसोबत वयाच्या २२ व्या वर्षी तिला तिच्या पहिल्या पुस्तकासाठी लेखक अन संकलक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर ती पुन्हा पुण्यात आली. 

Engineering ला आमची ओळख आणि मैत्री झाली ती आमच्या सामाजिक कामाच्या आवडीमुळे. आम्ही आमच्या मित्रांसोबत 'मानव्य' नावाच्या संस्थेला दर weekend ला आवर्जून जायचो. माझा हट्ट असायचा, तिथल्या चिमुकल्यांसाठी आणि शितलही न चुकता यायची माझ्यासोबत. 'मानव्य' जरा पुण्यापासून आडवळणाला म्हणून friends च्या bikes चा जुगाड करावा लागायचा पण कधी ती सोय नाही झाली तर भाजी नेणाऱ्या tempo मधेही आनंदात बसून यायची शितल. सहसा स्वतःच्या Comfort Zone च्या बाहेर न जाणारी शितू कामाच्या वेळी मात्र नेहमीच स्वतःला झोकून देते. 

पुण्यात परतल्यानंतर तिने TISS साठीची तयारी सुरु केलीच होती. मग सामाजिक चळवळीतली माणसं आणि TISS ला शिकलेली माणसं तिने शोधून काढली. त्यात तिची ओळख डॉ. प्रशांत भोसले सारख्या मित्रांशी झाली. त्यांचं मार्गदर्शन तिला ह्या पूर्ण प्रक्रियेत खूप मोलाचं ठरलं. आपल्या कामाच्या थोड्याश्या अनुभवाला वाचन, चर्चा अन लिखाणातून तिने अजून बळकटी दिली आणि TISS ची परीक्षा तिने उत्तम गुणांनी पास केली. ह्या सर्व घडामोडीं एक मित्र म्हणून मी खूप जवळून पहिल्या. हे सर्व तिला शक्य झालं कारण ती खूप focused होती, त्यासाठी तिने अचूक planning केलं होतं, वेळोवेळी तिने योग्य मार्गदर्शन घेतलं आणि त्याच्या जोडीला होती तिची जिद्द आणि मेहनत. TISS ला जाऊन नवीन विषय तर तिला शिकायला मिळालेच पण त्या दोन वर्षात तिने नेहमीप्रमाणे झोकून देऊन fieldwork केलं. मग मुंबईतील सफाई कामगारांचं आंदोलन असो किंवा ऐन उन्हाळ्यातल दिल्ली-ओडीशा मधला climate change चा शोध निबंध. आपल्या masters च्या thesis साठीही तिने स्वतःच्या गावापासून दूर विदर्भात 'बदलत्या हवामानाचा शेतीवर परिणाम' हा विषय निवडला होता.  TISS च्या दोन वर्षात तीने स्वतःला खूप exposure दिलं. अनेक लोकांना भेटणं, त्यांच्याशी चर्चा करणं, वाचन आणि लिखाण, प्रवास, internships अशातून तिचा अनुभव समृद्ध होत गेला.

प्रवास करणं, नवनवीन लोकांना भेटणं हे तिचे जगावेगळे छंद. विशेष म्हणजे माणसं जोडून ठेवणं तिला भारी जमतं. 

आम्ही मुंबईमध्ये शिकत असतांना खूप वस्त्या पायी फिरायचो अशावेळी तिचं observation खूप sharp असायचं. आमच्या चर्चांमधले तिचे मुद्दे खूप वेगळे असायचे. सामाजिक प्रश्नांबाबत तिची कळकळ कायम जाणवायची. माझ्या कित्ती तरी ideas आणि initiatives ना तीने विरोधही केलेला. एक Social Worker म्हणून व्यवस्थेच्या त्रुटींचा तिला खूप राग यायचा...आजही येतो पण त्याच बरोबर एक Engineer म्हणून ती pragmatic राहून solutions शोधत असते. तिची हीच वृत्ती तिला तिच्या कामात उपयोगी पडते. सध्या ती पुण्यातील INHAF संस्थेसोबत शहरी गरीबांच्या समस्यांवर काम करत आहे. अजून एक नवीन विषय explore करत आहे. कधी कधी तिचा हेवा वाटतो.

आपल्या सर्वांच्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आपला करिअर आणि लग्न. दुर्दैवाने नेमकं ह्याच गोष्टीत प्रतिष्ठा, समाज वगैरे विषयांना अधिक महत्व दिल जात आणि तिथेच आपले निर्णय चुकतात. शितलने मात्र स्वतःच्या आवडी-निवडी-कौशल्ये पाहून योग्य निर्णय घेतले. आज संसार सांभाळून ती आपलं काम त्याच dedication ने करतेय. लग्नानंतर सहसा मुलींचं नाव/आडनाव बदलतं, पत्ता बदलतो, ओळख/identity बदलते पण शितलने मात्र स्वतःच नाव तर बदललं नाहीच पण स्वतःची ओळख निर्माण केली. आज शितल आपल्या कामातून व्यवस्थेशी झगडतेय, बहुजनांच्या हितासाठी आणि त्याहून आधी स्वतःच्या समाधानासाठी. 

अशी ही Engineer turned Social Worker येत्या १६ नोव्हेंबर ला पुण्यात storified.me च्या निमित्ताने आपल्या समोर येणार आहे. तिची हि awesome journey  तिच्या तोंडून ऐकण्यासाठी पुण्यात असाल तर नक्की या. 
-------------------------------

शितल पवार 
ह. मु. वाकड, पुणे





















[हा लेख आम्हाला आमचे सहकारी रोशन केदार ह्यांनी लिहून पाठवलाय. धन्यवाद ROS]

धडपड्या कार्यकर्ता - राजू !


राजकारण म्हणजे दल-दल, चांगल्या माणसांनी कधीही राजकारणात जाऊ नये वगेरे वगेरे आपण नेहमीच ऐकतो. गेल्या दोन तीन वर्षात मात्र परिस्थिती बऱ्यापैकी बदलली. तरुणाई पुढे येउन राजकारणावर चर्चा करू लागलीय. थोडी फार जागरुकता आलीय म्हणायला हरकत नाही. पण सगळं जाणून निव्वळ राजकारणी वाईट म्हणून विषय संपत नाही. मुळ प्रश्न आहे तसाच राहतो. राजकारणाबद्दल एकूण निराशा वाढत असताना राजूसारखे लोक पुन्हा एकदा आपल्याला ह्या system वर विश्वास ठेवण्याचं आश्वासन देतात.

राजू केंद्रे! थोडक्यात सांगायचं तर एक धडाडीचा 'कार्यकर्ता'! पिंपरी खंदारे (जि. बुलढाणा) हे त्याचं छोटंस गावं. अधिकारी बनायला बाहेर पडलेला सामान्य शेतकऱ्याचा तो मुलगा. आई वडील दोन्ही शेतात कष्ट करून त्याला शिकवणारे पण योग्य माहिती आणि मार्गदर्शनाच्या अभावामुळे त्याला शिक्षणात खूप अडचणी आल्या. त्याचवेळी राजू 'धडक मोहिमे'त सामील झाला. मेळघाट मधील कोरकू आदिवासी जमाती सोबत राहून त्याने काम केले. तिथूनच त्याला समाज परिवर्तनाची जाणीव झाली. 

माझी आणि राजूची ओळख झाली ती आमच्या College (TISS) मुळे. त्याच्या बरोबर काम करण्याची संधी मात्र मला माझ्या Research मुळे मिळाली. त्यासाठी मी त्याच्या गावी गेले होते. ऐन उन्हाळा आणि त्यात गारपिटीनं झोडपला गेलेला शेतकरी. सगळीकडे दारूण परिस्थिती होती. त्यावेळी मी आणि राजू गावोगावी फिरलो, लोकांशी बोललो, त्यांच्या अडी-अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी राजू मात्र ह्या सर्व प्रश्नांना राजकीय उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत होता. लोकांचे निवडणुकी बद्दलचे अनुभव जाणून घेण्याचा जास्ती प्रयत्न करत होता.

आम्ही ग्रामपंचायत, ग्रामसभा, लोकांचा सहभाग आणि उदासीनता, सरकारी योजना आणि त्यातल्या तृटी, राजकीय उदासीनता - ह्या आणि अशा अनेक विषयांवर भर- भरून चर्चा केली. आपल्या गावात नवीन काही तरी व्हाव म्हणून राजूची कायम धडपड पण कसे गावातले गचाळ राजकारण त्याला अडथळा वाटे, हे तो नेहमी सांगत असे. त्याने खुपदा हे बोलून दाखवले कि ह्या प्रश्नांवर दुसरे राजकीय नेतृत्व हाच पर्याय आहे. मला ते त्यावेळी खरंच खूप बालिश वाटलेलं… अगदी अशक्य वाटलेलं!

पण त्यानंतर काही महिन्यातच गावातल्या ग्रामपंचायत निवडणुक जाहीर झाल्या आणि राजुनी ह्यावेळी निवडणूक स्वतः लढायचं ठरवलं. कित्ती दिवस विरोधी बनून असलेल्या राजकारण्यांना दोष द्यायचा? त्याउलट त्याने प्रस्थापित राजकीय नेतृत्व विरुद्ध रीतसर बंड पुकारले. गावातल्या तरुणांना संघटीत केले. त्याच्या मते, 'ग्रामपंचायत हा विकासाच्या राजकारणाचा खर पाया आहे. दरवेळी ग्रामपंचायतीमध्ये स्वार्थी लोकांची घुसखोरी होऊन गाव विकासापासुन कोसो दुर जातोय. तरुणांच्याच्या हातात असलेली ग्रामपंचायत गावाला विकासाच्या वाटेने नेईल म्हणून गावातील तरुणांना संघटीत होण्याची गरज आहे.' त्यानी जाहीरपणे सांगितलं कि त्याचा हा संघर्ष सत्ता आणि संपत्ती साठी नसून गावाच्या विकासासाठी आहे. आपला निवडणूक जाहीरनामा त्याने 'Bond' पेपरवर लिहून दिला. गाव-पातळीवर आडनावाचं (जातीचं) राजकारण केलं जातं. त्याला पूर्णविराम द्यायच्या निर्धाराने, राजूने स्वत: लोकांच्या निर्णयानुसार उमेदवारी गावातल्या मागासवर्गीय वार्डात जाहीर केली. तो चिकाटीन आणि 'प्रामाणिक'पणे लढला पण शेवटी पैसा, दारू, गुंडगिरीपुढे त्याची प्रामाणिक मेहनत कमी पडली आणि राजू ती निवडणूक हरला. प्रश्न हार-जीतचा नव्हताच कधी. प्रश्न होता प्रस्थापित नेतृत्वाला आव्हाहन देण्याचा. आणि ह्यात राजू १००% यशस्वी झाला.

आपल्या पराभवालाही त्याने तितक्याच जोमाने स्वीकारलं. तो आजही जोमानी ऐकवतो - 'जितना बडा संघर्ष होगा, जीत उतनी ही शानदार होगी!'. कधीही समाज परिवर्तनाच्या तीव्र संवेदनेने भारावलेला, स्वताला अभिमानानी 'भूमिपुत्र' म्हणवणारा, मेळघाट आणि कोरकू आदिवासींच्या मुद्द्यावर कळ-कळीने बोलणारा-लिहिणारा, College मध्ये आवर्जून मेळघाटची football team आणणारा, शेतकरी आणि आत्महत्या ह्यावर अस्वस्थ होणारा,  आपल्यापरीने ह्या समाज परिवर्तनाच्या लढयात योगदान देणारा - राजू - खरंच आपल्या सर्वांसाठी आदर्श आहे!

त्याच्या ह्या धडपडीला आमचा सलाम!

--------------------
राजू केंद्रे
ह. मु. पिंपरी खंदारे,
जि. - बुलढाणा

एक मुसाफिर! #ProjectGoNtive

सध्याचा तरुण (तरुणी सुद्धा) तसा बऱ्यापैकी जागरूक झालाय. पण तरीही अजूनही आपल्यातले खूप सारे जन चाकोरी बाहेर जाऊन काही करायला हजारदा विचार करतात. दुसऱ्याबद्दल वाचून हरखून जाणारे, आवेशात येउन facebook/twitter  गाजवणारे वीर (आणि विरांगानाही) अनेक पण असतात काही वेडी माणसं- 'जो अपने दिल कि आवाज सुनते हे! और निकाल पडते हे अपने दिल के रास्तो पर '. असाच एक आमचा 'ब्लॉग मित्र' हितेश भट.

TISS तुळजापूरहून पद्व्व्युत्तर (Post Grad) शिक्षण घेतल्यानंतर सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे त्यानेही colg मधून मिळालेली placement घेतली आणि हा कानपुरिया (मूळ गाव- कानपूर) बंगलोर शहरात आला. कामानिम्मित वेग-वेगळ्या राज्यांत फिरायची त्याला संधी मिळाली. तिथेही त्याने लोकांच्या समस्या जाणून घेउन ते आपल्या लिखाणातून मांडण्याचा प्रयत्न केला. हे सगळं सुरळीत होत असतांना त्याला मात्र अस्वस्थता जाणवत होती. मनातून त्या unseen & unheard गावांना जाऊन भेटण्याची इच्छा अधिकाधिक तीव्र होत होती. आणि एक दिवस त्यानी निर्णय घेतला, आपल्या नोकरीचा राजीनामा देण्याचा. नोकरी सोडून त्याने थेठ गाठले उत्तराखंड, तेव्हा पासून त्याचा आणि 'ProjectGoNative' चा हा प्रवास सुरु झालाय. अनोख्या जागांना भेटी देऊन तो तिथल्या लोकांचे कष्ट, दैनंदिन समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय.

हितेश रोजच्या रु.३०० बजेटनी भारतभर हिंडतोय. वेगवेगळ्या लहान, दुर्लक्षित खेड्यांना भेटी देत, नव-नवीन लोकांना सोबत त्याचा हा प्रवास सुरु आहे. निसर्गाच्या अधिकाधिक जवळ जाण्याचा तो प्रयत्न करतोय, त्याचे अनुभव लिहितोय आणि माझ्या सारख्या असंख्य लोकांना Inspire करतोय. तुम्हालाही इच्छा असेल तर त्याच्या ह्या प्रवासात तुम्हीही सहभागी होऊ शकता.

चौकटी बाहेर जाऊन स्वतःच्या मनाला पटतं म्हणून 'प्रवास' करणाऱ्या हितेशच्या ह्या साहसी निर्णयाला माझा सलाम आणि त्याच्या नाविन्यपूर्ण प्रवासाला शुभेच्छा!

हितेशच्या initiative बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी वाचा - https://thosethreedots.wordpress.com/about/


--------------------
हितेश भट
ह.मु . - निसर्गाच्या कुशीत

राजा होण्यासाठी आलोय!


जगण्याची रोज असामान्य धडपड पण त्यातही नियमांनी जगणारी माणसं विरळ! स्वतःच्या गरजेइतक राखून बाकीच इजा न करता ह्या निसर्गाला परत करनं, खरच आपल्यातल्या किती जणांना जमतं?
**************************************************************************

आमचा एक गृप आहे, शाळेत असतानाचा. सगळ्यांचा असतो तसाच. कुणी मस्तीखोर, कुणी अभ्यासू, कुणी सामाजिक बांधिलकी जपणारे, कुणी शांत तर कुणी  सगळ्या खबरी ठेवणार. तसे जवळजवळ सगळे फुकटच.
बस, वीक् एण्ड्ला भेटायच. तेही  ठाण्याच्या सुप्रसिद्ध उपवनमधे ( काहींच्या मते कुप्रसिद्ध). भेटायच म्हणजे  गप्पागोष्टी , धिंगाणा आणि रात्रीचे जेवण ओघाने आलं पण त्या दिवशी ही भेट खुप काही शिकवण देणारी ठरली. तलावाच्या बाहेरील बाजूला आमचा धिंगाणा चालू होता आणि आतील बाजूला (वय वर्ष  ते १०) काही मुले मासेमारीच्या उद्योगात गुंग होती. शेजारच्या बाजारात मासे विकणारी असावीत बहुतेक. परंतु विशेष लक्ष वेधत होता तो त्यांच्यामध्ये असलेला एक लहान मुलगा.  खाकी पँट, मळकट लाल सदरा आणि चेहऱ्यावर धीरगंभीर भाव आणि कामातील एकाग्रता. पण कुतूहल वाटले ते त्याच्या मासेमारी करण्याच्या पद्धतीचे, खरे तर त्याने प्रत्येक वेळी पाण्यात टाकलेल्या गळाला मासे लागत होते. परंतु तो त्यातील निवडकच आपल्या जवळ ठेवत होता बाकीचे पुन्हा पाण्यात सोडत होता. शेवटी आमच्यामधील एकाने विचारले 'काय रे? तुला मासे तर भेटत आहेत, मग पुन्हा पाण्या का सोडतो आहेस?' काहीशा ना-खुशीतच त्याने वर पाहिले आणि उत्तरला 'मला फक्त मोठे मासे हवेत' आणि तो आपल्या कामाला लागला. आमच्या मित्राने पुन्हा विचारले 'का? विकणारच आहेस ना! मग ने की सगळे'. तो मुलगा पुन्हा उत्तरला, 'नाही. हे मला माझ्यासाठी हवेत'. हे सगळं एकणारा आमचा दुसरा मित्र उद्गारला ' मित्रा तुच राजा होशील '.
मला अगदी त्याच्याच वयाचे असणारे आणि राज्याच्या प्रश्नाला आत्मविश्वासाने उत्तर देणारे शाहू महाराज आठवले 'राजा होण्यासाठी आलोय!'. अशीच करोडो सामान्यातील, 'असामान्य' लहानगी आपल्या देशात आहेत ज्यांच्यात हिम्मत आहे, आपले आयुष्य आपल्या Terms & condition वर जगण्याची!

--------------------
तळ्यावरचा मित्र, ठाणे
[हा लेख आम्हाला आमच्यावाचक पुजा प्रभाकर ह्यांनी लिहून पाठवलाय.
धन्यवादपुजा.]




रानफुल!



मी आणि पंकज प्रत्येक शनिवारी आणि रविवारी School Without Wall अंतर्गत आदिवासी मुलांना शिकवायला 'पंडिता शाळा, येउर' येथे जात असू. ठाणे शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेलं हे गावं. त्यालाच ठाण्याचे महाबळेश्वरही समजल जात. दुचाकी स्वार, प्रेमीयुगुल यांची त्यामुळे इथे नेहमीच गजबज असते. तसा हा भाग संजय गांधी उद्यानात समाविष्ट आहे. ह्या उद्यानाचा अविभाज्य भाग म्हणजे वर्षानुवर्षे इथे राहणारे, आदिवासी. जंगल हा त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. मुंबई अगर ठाणे यांसारखी शहरं हाकेच्या अंतरावर असली तरी जंगलच त्यांचं घर. प्रगती आणि विकासापासून दूर असणारे हे आदिवासी मनाने मात्र श्रीमंत. ह्या माळरानावर मला अनेक जण भेटले. काही जंगलातील हवे सारखे स्वच्छंदी तर काही माळरानावर फुलणाऱ्या फुलांसारखी निरागस तर काही आभाळा एवढं हृदय असलेलीमाणसं छोटी, डोंगर एवढी!
त्यात आवर्जून लक्षात राहिली ती उषा. उषा ही इयत्ता सातवीत शिकणारी मुलगी. सावळा रंग पण हसरा असा तिचा चेहरा अजूनही डोळ्यात तरळून जातो. आई वडील आणि सहा भावंड अशा मोठ्या कुटुंबात ती राहते. आई-वडिलांसोबत जंगलात शेती करण, लाकड गोळा करण हा तिचा दिनक्रम. यातून थोडा वेळ मिळाला तर शाळा. तरी तिला शाळा खूप आवडते. शाळा आणि जंगल या पलीकडे ती रमते ते तिच्या कवितांमध्ये. जंगलात फिरताना येथील माणसांवर आणि निसर्गावर केलेल्या कविता ती आठवून आठणून वहीत उतरवून ठेवते. अभ्यासात सामान्य असणारी उषा कविता मात्र असामान्य रचते. त्यातून ती आदिवासींचं जंगलाशी नातं दाखवते तर कधी बदलणारे ऋतू अनुभवते. तीच्या इतक्याच स्वच्छंदी आहेत तीच्या कविता.
हे सारं करतांना उशाला काळजी आहे ती विरळ होत जाणाऱ्या जंगलाची. 'हे जंगल विरळ होत, संपून तर जाणार नाही ना?'  अशीच चिंता तिला नेहमी सतावत असते. प्रत्येक ऋतूत घर बदलतांना हरवलेल्या आपल्या कवितांच्या पानांसारखी हि निसर्ग सृष्टी तर नाही ना हरवणार? हाच प्रश्न भेडसावत असावा तिला. म्हणतात ना दिव्याखाली अंधार. तसच काही झालय येउरच. जंगलात होत असणारे मानवनिर्मित बदल आणि अतिक्रमण उषाला आणि  तिच्या सारख्या सर्वांनाच त्यांच्याच जंगलात असुरक्षित करत आहेत. तेरा वर्षाची उषा. आज उषा कडे जुन्या कविता तर नाहीत, पण जंगल आहे आणि तिला ते जपायचंय. मी तिला शिकवायला जायचे पण खरतर तिने अन ह्या 'बिन भिंतीच्या शाळेन' मला खूप काही शिकवलं.
आज 'अच्छे दिन' आणण्याच्या प्रयत्नात आपण दुसऱ्या कोणाचे 'अच्छे दिन' तर  हिरावून तर घेत नाही आहोत ना? ह्यावर चिंतन करण्याची गरज आहे आपल्या सर्वांना. आजही ७० % भारत खेड्यात राहतो आणि तिथला आदिवासी जंगलात. जे एका चिमुरडीला  समजल ते आपल्याला का म्हणून नाही कळावं?
------------------------------------------------------------
उषा
. मु. पंडिता शाळा, येउर

[हा लेख आम्हाला आमच्या वाचक पुजा प्रभाकर ह्यांनी लिहून पाठवलाय. धन्यवाद पुजा.]